दु:ख म्हणजे नक्की काय असतं?

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

अप्पा म्हणजे क्लासिक मिडल क्लास माणूस: ठरलेल्या वेळी ठाण्याहून लोकल पकडणे, ठरल्या वेळी परतीची लोकल पकडणे, येताना भाजी, इस्त्रीचे कपडे, दळण इ. घेऊन घरी येणे. घरी आले की दुसरी ड्यूटी सुरू: चहा ठेवणे, झाड-लोट, दिवा लावणे व काही राहिलं असेलच तर पुन्हा तीन मजले उतरून दुकानात जाऊन ते आणणे. घरी बायको, एक १०-१२ वर्षांचा मुलगा व एक काॅलेजात जाणारी मुलगी. बायको अनेक वर्षं पाठीच्या दुखण्याने ग्रासलेली. कदाचित म्हणूनच अप्पा घरातलं इतकं काम करायचे. त्यांच्यामुळेच घर आनंदी असायचं. घरात पैसा बेताचा, पण देवाच्या दयेने खाण्यापिण्याची आबाळ नाही. आपल्या बहिणीच्या कुटुंबाला, इतर गरजू नातेवाईकांना अप्पा जमेल तशी मदत करायचे. नात्यातलं बारसं असो वा लग्न की गिरगावातील घरचा गणपती असो, अप्पा हजर असायचे. सगळ्यांनाच त्यांचा फार आधार वाटे.

म्हटलं तर पिक्चर-पर्फेक्ट कुटुंब व अप्पा म्हणजे स्वप्ननगरीतला नवरा.

पण ह्या घराला कुणाची तरी दृष्ट लागली. एके दिवशी अप्पांना कार्यालयात फोन आला: तडक निघून या, मुलीचा काॅलेजला जाताना अपघात झाला आहे!

व्ही.टी.हून ठाण्याला यायला तासभर जातोच. तोवर अप्पांच्या जिवात जीव नव्हता. परतून पाहतात तो काय, फलाटावरच नातेवाईक-शेजाऱ्यांची गर्दी! मुलगी अपघातात दगावली होती! अप्पांचा विश्वासच बसेना. पोलीसांचे प्रश्न, राजावाडी रूग्णालयास भेट, पंचनामा...काहीच कळेनासं... एका वाईट स्वप्नासारखं.

काही दिवसांनी भेटायला आलेले नातेवाईक परतू लागले. ते तरी किती दिवस थांबणार?

मग अप्पाही कामावर जायला निघाले. सोबतीस एक पुतण्या निघाला. फलाटावर पोहोचताच अप्पांचा श्वास कोंडला, पाय जड झाले. तसे ते बाकावर बसले. रूळाकडे पाहत राहिले: पूल सोडून आपली मुलगी रूळ का बरं ओलांडून गेली? ती खरंच ह्या जगात नाही का? त्यांना वारंवार वाटे की हे सारं एक वाईट स्वप्न आहे जे इतक्यात संपेल व त्यांना जाग येईल, त्यांच्या पूर्वीच्या आनंदी घरकुलात... पुतण्याने हात दिला व अप्पा गाडीकडे निघाले.

हळूहळू ते एकटे कामावर जाऊ लागले. येताना दळण, इस्त्री... ते मोठ्या धीराने आयुष्याची घडी पुन्हा कशीबशी बसवू लागले; पण काही वर्षात त्यांच्या सुखाला पुन्हा गालबोट लागणार होतं...

मुलाचं शिक्षण कसंबसं पूर्ण झालं. तो छोटंमोठं काही काम करू लागला. पण त्याचं नोकरीत मन रमेना. त्याने अप्पांकडे एखादा धंदा करायची इच्छा व्यक्त केली. पण धंद्यासाठी पैसे आणावे कुठून? तरीही काय करता येईल ह्याचा विचार अप्पा करू लागले. कुणा आल्यागेल्यालाही त्यांनी कधी नाही म्हटलं नव्हतं. हा तर त्यांचा मुलगा होता.

अप्पांना सुचलं की गावचं घर त्यांच्या नावावर होतं पण त्यांचा धाकटा भाऊ तिथे राहत असे. ती जागा विकून तो जर एका छोट्या घरात गेला तर त्यांच्या हाती थोडे पैसे येतील. दोन दिवसांची रजा टाकून अप्पा गावाकडे निघाले. इतर नातेवाईकांसारखंच ह्या भावासाठीही अप्पांनी खूप केलं होतं. कधी त्याच्या मुलांना शालेय पुस्तकं घेऊन दिली तर कधी मुंबईला आल्यास त्यांना कपडे केले.

पण जागेचा प्रश्न आला तेव्हा सख्ख्या भावाने अप्पांचे उपकार विसरून त्यांचा अपमान केला. “टीचभरही जागा देणार नाही”, असं म्हणत अप्पांना चक्क घरातून निघून जायला सांगितलं. त्याची प्रतिक्रिया इतकी अनपेक्षित होती की अप्पांना काय बोलायचं तेच कळेना. पूर्वी हाच भाऊ भेटला की न चुकता अप्पांना वाकून नमस्कार करत असे. आपल्या मुलीच्या लग्नात त्याने अप्पांची ओळख वडील-भाऊ अशी केली होती. आणि आज हाच भाऊ टीचभर जागा देणार नाही म्हणाला?! सुन्न अशा अवस्थेत अप्पा तेथून निघाले. बस स्टॅंडला येऊन बसले. मुंबईची बस लागली. निघूनही गेली. रात्र झाली. अप्पा तिथेच बाकावर आडवे झाले व मानसिक ताणामुळे त्यांचा डोळा लागला.

पहाटे जाग आली तेव्हा आदल्या दिवशीचा प्रकार जणू एक वाईट स्वप्न वाटत होता. “भावालाही कदाचित जागेचा विषय अपेक्षित नव्हता. म्हणून कदाचित असा उलटून बोलला असेल?”, अप्पांचं मन भावाच्याच बाजूनी विचार करत होतं. पुन्हा भावाकडे जाऊन बोलू असा विचार आला. ते पुन्हा घराकडे निघाले. भाऊ दारातच बसला होता, चहा पीत. अप्पांना बघून नमस्कार नाही, ‘या, बसा’ वगैरे नावापुरतंही नाही.
त्याने तुसडेपणाने, “तुम्ही, परत?” एवढंच विचारल.
“अरे, माझं म्हणणं तरी ऐकून घे”, अप्पांना अजूनही आशा होती.
पण तो मात्र, “मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. या तुम्ही”, असं उद्धटपणे म्हणाला.

विषय संपला आणि नातंही. अप्पांचा पाय निघेना. त्यांच्या वडिलांनी प्रेमाने बांधलेलं ते घर होतं. त्याला अप्पांनी डोळेभरून पाहिलं व निघाले. ह्यावेळी बस चुकली नाही, पण बस सुटली तसा हृदयाचा ठोका मात्र चुकला. बसने वेग पकडला तशी मनातली कालवाकालवही वाढत गेली. इतकी वर्षं गरजू नातेवाईकांना मदत करून आपण चूक केली का? माणूस इतका मुजोर कसा होऊ शकतो?

अप्पा घरी परतले तसं मुलाने आशेने विचारलं, “काय झालं? काका आपल्याला जागेचे पैसे देणार का?”
खिन्न चेहऱ्याने अप्पा नुसतेच बसले. थोड्या वेळाने त्यांनी बायको, मुलाला घडलेला प्रकार सांगितला.
“मी त्यांना समज देतो!”, मुलगा रागाने म्हणाला.
“आपल्याला काहीही वेडंवाकडं करायचं नाही”, अप्पांनी बजावलं.
“पण आपल्याला कोर्ट-कचेरी परवडणार नही, अप्पा”, मुलाने उलट उत्तर दिलं.
“खरं आहे. तरीही आपण तसं काही करायचं नाही”.

पुढील काही दिवस अप्पा अधिकाधिक गप्प राहू लागले. घरी, कामावर त्यांचं लक्षही नीट लागेना. त्यांची मन:स्थिती बदलावी म्हणून मुलगा सुट्टीच्या दिवशी अप्पांना नातेवाईकांकडे किंवा नुसतं फिरायला घेऊन जाऊ लागला.

मुलीच्या मृत्यूनंतरही अप्पा इतके खचले नव्हते असं त्यांच्या परिवाराला वाटू लागलं. अशाच परिस्थितीत दोनतीन महिने उलटले. मग एकेदिवशी अप्पा घरी आले तेव्हा छातीत दुखतंय असं बायकोला म्हणाले. घाबरून तिने मुलाला फोन केला. जमेल तितक्या लवकर मुलगा रिक्षा घेऊन आला. घर तिसऱ्या मजल्यावर व इमारतीला लिफ्ट नव्हती. मुलाने अप्पांना कसंतरी खाली आणून रिक्षेत बसवलं. डाॅक्टरांनी बायपास करावी लागणार असं सांगितलं. बॅंकेत फार पैसे नव्हते म्हणून मुलाने मित्र, नातेवाईकांकडून उसने घेतले. कशीतरी पैशाची सोय झाली.

सुदैवाने शस्त्रक्रिया नीट पार पडली व काही दिवसांत अप्पा घरी परतले. मात्र, त्यांना आता लोकलने प्रवास करण्यास मनाई होती. अर्थातच, नोकरी सुटली.

आता घर मुलाच्या तुटपुंज्या पगारावर अवलंबून होतं. दिवस उजाडल्यापासून व्यग्र असणारे अप्पा आता दिवसभर नुसतेच घरात बसून असत. जिनेही चढ-उतर करायला इतक्यात चालणार नव्हतं म्हणून घरातून बाहेरच पडता येईना. घरातली परिस्थिती ढासळत होती त्यामुळे अप्पा आणखीनच खचले. आयुष्यभर लोकांच्या गरजा भागवत आलेले अप्पा आता स्वत: लाचार झाले होते. हे त्यांना अजिबात खपत नव्हतं.

पुढल्या तपासणीनंतर डाॅक्टरांनी दिवसातून एकदा इमारतीचे ३ मजले चढ-उतर करायला परवानगी दिली. मग अप्पांचा रोजचा बाजारहाट सुरू झाला. त्याबरोबर ते नोकरीही शोधू लागले. अपेक्षा फार नव्हत्या. घराजवळ काही छोट-मोठं कामं मिळालं तर घरखर्चाला थोडा हातभार लागेल व वेळही चांगला जाईल. पण साठीनंतरच्या माणसाला नोकरी मिळेना.

भावाने दिलेला धोका, केलेला अपमान, घरची ढासळती परिस्थिती... अप्पांची मानसिक व त्यामुळे शारिरीक स्थिती खालावतच गेली.

मनाला उभारी येईल असं काहीतरी करा, असा सल्ला डाॅक्टरांनी वारंवार दिला. पण अप्पांमधे काहीच बदल होईना. बघता बघता त्यांची तब्ब्येत आणखीनच ढासळली आणि वर्षभरातच अप्पांनी देहाचा त्याग केला.

सर्वांना तोच प्रश्न भेडसावत होता: तरूण मुलीच्या मृत्यूला खंबीरपणे तोंड देणाऱ्या अप्पांनी अपमानाचा इतका धसका घेतला? जर त्यांनी त्या अपमानाला इतकं महत्त्व दिलं नसतं तर...

सुख वा दु:खाला नको तितकं महत्त्व दिलं की आयुष्य अशा जर-तर च्या प्रश्नांवर अवलंबून होऊन बसतं. अमुक गोष्ट वा व्यक्ती हे आयुष्याचं सार्थ कसं असू शकतं? पण दुर्दैवाने बहुतेकांसाठी ते तसंच असतं. नकळत आपण सगळेच अशा कुठल्या न कुठल्या गोष्टीवर नको तितके अवलंबून होऊन बसतो. मग ती गोष्ट गमावली किंवा व्यक्ती दुरावली की जणू पत्त्यांचं घर कोलमडून पडतं.

- केशव पाटणकर



११ टिप्पण्या:

  1. Pappa Tumchi Khoopach Aathvan Yetey Tumchyashivay Aapla Pariwar Apurna Aahe So Miss U So Much Tumcha Ashirwad Sadaiva Aamchya Pathishi Asu Dya Aamchyasathi Tumhich Aamche Aadarsha hotat aahat aani agdi shevatparyanta rahanar so love u so much we all miss u

    उत्तर द्याहटवा
  2. Khup chhan ....khup sundar lihilay Dada...mi pappa na nahi bhetu shakle kadhich yach nehmi vaait vatat pan...te sarvache favorite aahet...we all miss him...Thanks Dada...Pappa na khup javalun Anubhavlyasarkha vatal...he lihilyabaddal khup khup thanks...

    उत्तर द्याहटवा
  3. स्वताचा विचार न करता केवळ कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करणारी व्यक्ती म्हणजे अपा‌‌.

    उत्तर द्याहटवा
  4. कथा हृदयद्रावक आहे .. very well written Keshav.

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच छान लिहिले आहे. अप्पांची व्यक्तीरेखा अगदी पटकन समोर उभी राहिली....

    उत्तर द्याहटवा
  6. घराघरात घडणारी.. अगदी ओळखीची वाटणारी कथा.. विचार मात्र नव्याने केलेला.. मनाला उभारी देणारा..अप्पांची व्यक्तीरेखा चटका लाऊन जाणारी.

    उत्तर द्याहटवा
  7. Pappa(Appa)
    ...Ajahi ekahi divas asa jaat nahi jevha tumchi aathvan yet nahi...tumcha aashirwad nehmich amchya sobat asel pan tumcha Mayecha haat matra nahi yaach khup vaait vatat...Thanks Keshav dada...punha ekda tyana bhetata aal tujhya shabdantun..

    उत्तर द्याहटवा
  8. Kaka mala fakt kaka manun nahi tar tyancha mulga manun preteyak ghosht samjavun sangat I always miss u kaka (Appa)

    उत्तर द्याहटवा
  9. आपा देव होते त्यानच कमी बोलने पण चागले मार्गदर्शन करायचे त्यानचाबदृदृल मी काय बोलु माझा कडे शब्दच नाही लाखात/करोडात आपा एक होतेl miss u Appa

    उत्तर द्याहटवा