भय एक संवेदना

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

लहान ३/४ वर्षाची तनु उगीचच कटकट करत होती व रडत बसली होती . समोर ठेवलेले दूध पीत नव्हती. तिची आई तिला समजावत होती. बरेचदा समजावून झाले. गुण्या-गोविंदाने , प्रेमाने, लाडाने; पण ती काही रडणे थांबवत नव्हती. 

शेवटी कंटाळून दमदाटी करण्यास सुरुवात केली व मग शेवटी रागावून म्हणाली, “आता पोलीसांना बोलवेन हं ! कोण उगीचच रडतय. केव्हाचे!”.

"पोलिस" शब्द ऐकून छोटी तनु म्हणाली ,"नको नको .पोलीस नको” म्हणत तिने पुढ्यातील दुध हळुहळु संपविले व रडणे पण बंद केले . एकूण काय तनूच्या आईला तिचा हट्ट , रडणं संपविण्यास पोलिसांची भीती वा भय दाखवावे लागले; वा भय तयार करावे लागले. 

भीती ही माणसाच्या मनाची एक संवेदना आहे. मनुष्य लहान म्हणजे अगदी तान्हा असतो तेव्हा त्यास कसलीच भिती नसते. ना अग्नी ,ना कुठला प्राणी . जस जसा त्याच्या मेंदूचा विकास होतो. तस तसे त्याच्या मानसिक भावनांचा संवेदनांचा विकास होतो. त्याच्या राग ,लोभ ,मोह ,भय, भिती वगैरे भावना जागृत होतात. 

त्यातील भिती या भावनेचे पण अनेक प्रकार असतात. भय जात्याच असते, भिती ही तयार केलेली वा तयार झालेली असते .भय ब-याच गोष्टींचे असते .जसे अंधाराचे भय . अंधारातून जावयास बालवयात भय वाटते.अंधारात असुरक्षितता भासते. त्यामुळे असुरक्षिततेचे भय असते. मुलींंना वा स्त्री जातीला वा सर्वाना अंधारातून जातांना असुरक्षितता भासते. व त्यामुळे अंधाराचे भय तयार होते. 

असुरक्षितचे भय स्त्रीयांच्यात नेहमी असते. वेळ प्रसंगी तोंडावर न दिसू देता वरून शूरपणाचा, धारिष्टतेचा आव आणून प्रसंगावधानाने वेळ निभावून नेतात. पण मनात असुरक्षिततेची भिती असतेच.

तशीच असुरक्षितता वस्तूंच्या बाबतीत असते . त्यामुळे चोरीचे भय तर सर्वाना असतेच.किंमती वस्तू ,दाग दागिने महत्वाचे पेपरस् वगैरे हरवू नयेत .त्यांना जपण्याचे, संभाळणे , गहाण तर होणार नाहीत ना असे भयाचे दडपण मनात असतेच. ही झाली वस्तू संभाळतांनाची भिती. 

त्याच प्रमाणे भिती अपयशाची वाटत असते. आपण नक्की केल्या प्रमाणे मार्कस् मिळतील ना? पुढे मना सारखे जॉब वा सर्वीस मिळेल ना? मनासारखे यश प्राप्त होईला ना? अशा प्रकारच्या मानसिक दडपणाची भिती मनात असतेच. 

पण काही भिती अशा असतात ज्या मनात ठाम मांडून असतात .काही अशा गोष्टींचे भय मनात सतत असते .ज्याला फोबिआ (अकारण भिती)म्हणतात .अति उंची चे भय ,अति उंचावरून खाली पहाणे भितीदायक वाटते. वा लिफ्टमधे बसण्याचे भय , ईलेक्ट्रीसीटीचे भय ,पाण्याचे भय, वगैरे. तसेच काही भय वाढत्या वयानुसार कमी पण होतात.

काही भय वा भिती अशा असतात की भिती वाटत असून मनोरंजन म्हणून भिती वाटत असून त्या भयाचा अनुभव घेण्यास आवडतात. जसे मेरी गो राउंड वा रोलर कोसटर ची राईड वा झुरासिक पार्क मधील राईड . Bounty jumping या राईड मधे मनोरंजन म्हणून बसतात मोठ्याने ओरडून भय दूर करतात . आणि मजा व साहस अनुभवतात.

तसेच प्राण्यांचे भय असते. अगदी कुत्रा सारख्या प्राण्याचे वा बायकांना तर पाल झुरण सारख्याचे भिती /भय असते . कुठे गेले की आधी भिंती कडे नजर टाकून पाल नाही ना ?ची खात्री करुन घेतात. आणि त्यांना कुठून तरी पाली दिसतात . हो खोट नाही मी तर थिएटर मधे पण एकदा पाल पाहिली होती .व मिस्टरांना दाखविली पण होती .त्यावर ते म्हणाले पण 

" आता इथे पण मला , तिला हकलवण्यास सांगू नको. हं. 

तर काय आहे ....म्हणतात ना "भित्या पाठी ब्रह्मराक्षस"

मनी भय असले की दिसतेच.

सभाधारिष्टतेचे भय पण असते. वक्ते होण्या अगोदर चार लोकांच्यात बोलणे सभेला उद्देशून बोलणे.नटांना वा कलाकारांना अगोदर भिती असते पण मग सरावाने त्यांना अंगवळी पडून भिती रहात नाही. पुढे सहजतेने सभा धारिष्ट्यता येउन भिती दूर होते. ही भिती वाढत्या वयाला कमी होते. 

अशी अनेक प्रकारची भिती माणसास असते. पण ह्या सर्वाहून भय असते,ते आपल्या हातून कधीच वाईट गोष्टी ,कर्म घडू नये. खोटे बोलणे ,चोरी ,लबाडी ह्या पासून दूर रहाणे. व हे भय सकारात्मक भय आहे. त्या भयाने आपले मन सदा पापभीरू रहाते. व हे भय मनास वाईट कृत्यापासून परावृत्त ठेवते. एवढेच नव्हे तर आपले मनोबळ वाढविते. सकारत्मकता अंगी आणते. तेव्हा प्रत्येक कर्म करतांना चांगलेच काम करण्याची वृत्ती बाळगण्याचे भय सतत बाळगावे, हे भय असलेच पाहिजे. म्हणजे ख-या अर्थाने "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." असा देवाचा संदेश कानात घुमत रहातो. व आपण भय मुक्त होतो.

वैशाली वर्तक









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा